ठाण्यातून दक्षिण मुंबईत पोहोचणे आता सोप्पे होणार आहे. सिग्नल वा ट्रॅफिकची कटकट संपणार असून आता ठाणेकर अवघ्या 25 मिनिटांत दक्षिण मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (MMRDA)ने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर-घाटकोपर ते आनंद नगर ठाणेपर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. लवकरच हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
कसा असेल हा प्रकल्प?
एकूण 13.90 किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत 6 पदरी हाय-स्पीड कॉरिडॉरमुळं दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास अवघ्या 25-30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. हा कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.
ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलाशी मुलुंड ऑक्ट्रोय नाका येथे आणखी एका उन्नत कॉरिडॉरशी सुलभपणे जोडला जाईल, ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाशी देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, प्रदूषण कमी होईल तसेच लाखो नागरिकांना अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक गतिविधींनाही गती मिळेल.
सध्या या कॉरिडॉरच्या प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण झाली आहेत. तसंच, भू-तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर आहेत. तसंच, टेस्ट पाइल्स पूर्ण झाली आहेत.
या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट्ये
-२.५ मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, मजबूत पीयर्स, ४० मीटर स्पॅन आणि २५ मीटर सिंगल-सेगमेंट सुपर स्ट्रक्चर .
– MMR मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली .
– मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप-डाऊन रॅम्प .
– नवघर उड्डाणपूल येथे ३+३ पदरी उन्नत टोल प्लाझा . अखंड, सुरक्षित आणि हाय-स्पीड प्रवासासाठी डिझाइन.
