हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा जड वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुनावळे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटीच्या समोरून जात असताना तन्वी सिद्धेश्वर साखरे ही तरुणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. तन्वी दुचाकी चालवत होती तर तिचे वडील मागच्या सीटवर बसले होते. याचदरम्यान मागून येणाऱ्या एका डंपरने अचानक वेगात दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की बापलेक दोघेही रस्त्यावर फेकले गेले. तन्वी दुर्दैवाने थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली आली आणि काही क्षणातच तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील यामध्ये थोडक्यात बचावले असले तरी धक्क्यातून सावरू शकत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातानंतर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी घटनास्थळाहून पळ काढला. नागरिक आणि प्रवाशांनी त्वरित पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम राबवली. अनेक तासांच्या तपासानंतर अखेर सायंकाळच्या सुमारास आरोपी डंपर चालक अजय ढाकणे याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. हिंजवडीसारख्या वर्दळीच्या भागात RMC ट्रक, डंपर आणि मोठ्या मालवाहू वाहनांची अनियंत्रित वाहतूक ही गेल्या काही महिन्यांपासून मोठी समस्या बनली आहे. सकाळ-संध्याकाळ आयटी पार्कला जाण्या-येण्याच्या वेळी या वाहनांचा वेग, नियमांकडे केलेले दुर्लक्ष आणि वाहतूक पोलिसांची कमी उपस्थिती यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
गेल्या 11 महिन्यांत याच प्रकारच्या RMC आणि डंपर वाहनांनी केलेल्या अपघातांत तब्बल सात महिलांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक रहिवासी अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत असूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केल्याचे जरी दिसत असले तरी दीर्घकालीन उपाययोजना नसल्याने मोठ्या वाहनांच्या बेफाम वाहतुकीला आळा बसेल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तन्वी साखरेच्या दुःखद मृत्यूनंतर पुन्हा एकदा हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थेचे वास्तव समोर आले असून, रस्ते सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने तत्काळ आणि कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
