प्रशासकीय कामासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नेहमी चर्चा होत असते. मात्र राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे आयएएस अधिकारी असणारं जोडपं चर्चेत आलं आहे. आयएएस दाम्पत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी भारती दीक्षित यांनी त्यांचे पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारू पिऊन मारहाण करणे, अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकणे आणि पिस्तूलच्या धाकाने बंधक बनवून घटस्फोटासाठी धमकावल्याचा आरोप आयएएस भारती दीक्षित यांनी केला आहे. या प्रकरणी एसएमएस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस भारती दीक्षित यांनी 7 नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, त्यांचे पती आयएएस आशीष मोदी यांनी दारूच्या नशेत घरात खूप गोंधळ घातला. इतकंच नाही, तर त्यांनी दीक्षित यांच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि त्यांना पिस्तूल दाखवून धमकावलं. रुममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. तसंच, घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला, असा आरोप दीक्षित यांनी केला आहे.
पतीकडून दीर्घकाळापासून मारहाण सहन करावी लागत होती. तसंच पतीने मला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होतं आणि मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही आरोपी अधिकाऱ्याने दिल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, हे दोघेही राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत. भारती दीक्षित सध्या राजस्थान सरकारमध्ये संयुक्त सचिव आहेत, तर त्यांचे पती आशीष मोदी सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी भारती दीक्षित यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. तसंच पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, चौकशीनंतर आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
