राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून २५ जुलैपर्यंत तब्बल १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज पात्र ठरले आहेत, तर २४ हजार ७८ अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकार दरमहा १,५०० रुपयांचे अनुदान पात्र महिलांच्या खात्यात जमा करत आहे. या योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसी म्हणजे लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी. ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास अनुदानाची पुढील रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते.
लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते, असे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी कळवले आहे.
या योजनेत ठाणे जिल्ह्यातील ९,१५,६९६ महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी ९,०२,६११ अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच विशेष विकसित ‘नारी शक्ती दूत’ अॅपच्या माध्यमातून ५,५०,१८० अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यातील ५,३९,१८७ पात्र, तर १०,९९३ अपात्र ठरले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी किती?
लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरु झाली. २८ जून २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली होती. ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या थेट २ कोटी ५६ लाखांवर पोहोचली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आलेली, मात्र महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती.
