विवाहित मुलीला भेटायला गेलेले वडील अचानक बेपत्ता झाले. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र तरीही कुठेही त्यांचा पत्ता लागला नाही. कारण, रस्त्यात येताना विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला होता. अखेर आठ दिवसानंतर सोनाखेडा येथील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीला भेटायला आलेल्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
अशोक तातेराव गायकवाड (वय 43 रा. मोंढा छत्रपती संभाजीनगर) असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी अशोक गायकवाड हे घरातून बाहेर पडले होते. खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे राहणाऱ्या विवाहित मुलीला भेटून येतो, असं सांगून ते घरातून निघाले होते.
त्यानंतर अशोक गायकवाड यांनी सोनखेडा येथे जाऊन आपल्या मुलीची भेट घेतली. त्यानंतर ते माघारी परतण्यासाठी निघाले. मात्र, दोन दिवस उलटूनही ते घरी परतले नाही. यामुळे नातेवाईकांनी मुलीकडे विचारपूस केली. तेव्हा तिने सांगितलं की, बाबा माझ्याकडून त्याच दिवशी निघाले होते. वडील अजून घरी पोहोचले नसल्याचं कळताच लेकीच्या जीवालाही हुरहुर लागली. मुलगी, जावयासह नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ते कुठेही सापडले नाहीत.
31 ऑक्टोबर रोजी नातेवाईकांनी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आठ दिवसानंतर सोनखेडा येथील साहेबराव वाकळे यांच्या गट क्रमांक 74 येथील विहिरीमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयताच्या जवळ असलेल्या कागदपत्र व माहितीवरून ते अशोक गायकवाड असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेची माहिती मिळतच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. अशोक गायकवाड यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूचे नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ पांढरे पुढील तपास करीत आहेत.
