पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी हा जगभरात कायमच चर्चेचा विषय ठरतो. कधी ऐतिहासिक ठिकाणांचं महत्त्व न समजून घेता केलेलं कृत्य तर कधी हॉटेलमध्ये घातलेला गोंधळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने उपद्रवी पर्यटक कायमच बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत असतात. मात्र राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर एका गुजराती कुटुंबाने केलेल्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय
नेमकं या पर्यटकांनी केलं काय?
राजस्थानमधील माउंट अबूजवळील सियावा येथील हॅपी डे हॉटेलमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या एका गुजराती कुटुंबाने हॉटेलच्या बिलाचे पैसे न देता पळून जाण्याचा कट रचला. विशेष म्हणजे या पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे पर्यटक आधी हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी भरपूर पदार्थ मागवले. नंतर ते मनसोक्त जेवले. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी हळूच तिथून पळून जाण्याचं ठरवलं.
कसा पळ काढला?
या पाच जणांनी एक-एक करून वॉशरूममध्ये जाण्याचे नाटक केले, नंतर बाहेर पडताच कारमध्ये बसून पळून जाऊ लागले. मात्र हॉटेल मालक आणि वेटरला संशय आला आणि त्यांनी लगेच या पाच जणांचा पाठलाग केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार गुजरात-राजस्थान सीमेवरील अंबाजीकडे जाताना स्पष्टपणे दिसत होती.
वाहतूक कोंडीत अडकले अन्…
हॉटेल मालकाने ट्रॅफिकमधून गाडीचा पाठलाग केला आणि गुजरात सीमेवर पोहोचला. पोलिसांच्या मदतीने, त्या पाचही जणांना ट्रॅफिकमध्ये अकलेले असतानाच पकडण्यात आले. त्यानंतर भररस्त्यात तुफान बाचाबाची आणि राडा झाला. घाबरलेल्या पर्यटकांनी एका मित्राला फोन केला आणि बिल भरण्यासाठी ऑनलाइन मनी ट्रान्सफरची मागणी केली. शेवटी, पर्यटकांनी त्यांच्या मित्राकडे पैसे मागितले आणि बिल भरले.
अशा पर्यटकांमुळे इतरही लोक बदनाम होतात
या पर्यटकांना हॉटेल मालकाने रंगेहाथ पकडल्यानंतर रस्त्यातच या पर्यटकांचा आणि हॉटेल मालकाचा वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पर्यटकांनी स्वत:बरोबरच राज्याचंही नाव खराब केल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अशा पर्यटकांमुळे सर्वसामान्य पर्यटकही बदनाम होतात असं म्हणत अशा लोकांना कठोर शिक्षा केली पाहिजे असं म्हटलं आहे.
