नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थात देवी विसर्जनाच्या दिवशी एक तरुण देवी विसर्जन करण्यासाठी गिरणा नदी पात्रात उतरला होता. विसर्जन करून तो परत येत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला. तरुणाचा पूर्ण शोध घेतला तरीही, तरुण कुठेही आढळून आला नाही. मात्र नवरात्रीच्या तब्बल वीस दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला.
संपूर्ण गावावर शोककळा
हेमंत संतोष पाटील वय 18 (रा. मयुरेश्वर कॉलनी जळगाव) हा तरुण देवीच्या विसर्जनाच्या दिवशी नदी पात्रात गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला. पाय घसरल्याने तो पाण्याला प्रवाह असल्याने तो वाहून गेला होता. त्याचा संपूर्ण तपास केला, तरीही तो कुठे आढळून आला नाही. मात्र ऐन दिवाळीच्या सणाला पाटील कुटुंबावर भाऊबीजेच्या दिवशी मोठं संकट कोसळलं. वाहून गेलेला हेमंतचा मृतदेह दोनगाव शिवारातील पाटील कुटुंब यांच्या हाती लागला. भावाचा मृतदेह भाऊबीजेच्या दिवशीच समोर आला आणि सर्वांनाच धक्का बसला. बहिणीने भाऊबीजेच्या दिवशी तिरडीवरच भावाची ओवाळणी करुन त्याला शेवटची भाऊबीज केली. या घटनेने सर्व उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं. संपूर्ण गावावर हेमंतच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.
निमखेडी रेल्वे पुलाजवळ 3 आक्टोबर रोजी हेमंत नदीत वाहून गेल्यानंतर मागील वीस दिवसांपासून त्याच्या कुटुंबाकडून त्याचा शोध घेणं सुरूच होतं. अखेर डोणगाव शिवारात एका तरुणाचा मुतदेह आढळून आला असल्याची माहिती काही नागरिकांनी गावातील पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस आणि पाटील कुटुंबातील सदस्य तिथे पोहोचले.
कपड्यावरून पटली ओळख
हेमंतचं कुटुंब वीस दिवसांपासून त्याचा शोध घेत होतं, मात्र त्याचा कुठेही शोध लागला नव्हता. भाऊबीजेच्याच दिवशी हेमंतचा मृतदेह दोनगाव परिसरात आढळून आला. त्यानंतर पाटील कुटुंबीय पोलिसांसह तिथे पोहोचले. त्यावेळी हेमंतच्या कपड्यावरुन त्याची ओळख पटली. हेमंतचा मृतदेह पाहताच कुटुंबाने एकच टाहो फोडला.
बहिणीने तिरडीवरच केली भावाची शेवटची भाऊबीज
हेमंतला एक जुळा भाऊ आहे आणि एक बहीण आहे. हेमंत दोन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. घरातीलच कर्ता गेल्याने आईनेच त्या तीन मुलांचा सांभाळ केला. वडील नसतानाही आईने मुलांना मोठं केलं. त्यानंतर आता लेकाच्या निधनाने पुन्हा एकदा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. हेमंतचा मृतदेह सापडला त्यादिवशी भाऊबीज होती. बहिणीने भावाला तिरडीवर ओवाळलं, त्याची शेवटची भाऊबीज केली, हे दृष्य पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं.
