महाराष्ट्रातील मच्छीमारांना धक्का देणारी मोठी माहिती समोर आली आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करुन अवघा महिनाभर उलटलेला असतानाच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये चीनच्या 600 अवाढव्य फॅक्ट्री जहाजांबरोबरच इतर राज्यांमधील मच्छीमार बोटींनी प्रवेश केला आहे. या जहाजांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या हक्काची लाखो टन मासळीची लूट महिन्याभरात करण्यात आली असून अजूनही ही लूट सुरुच आहे.
कुठून आल्या आहेत या बोटी?
कायद्यानुसार महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये परदेशी आणि परप्रांतीय जहाजांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र राज्याचा हा बंदी कायदा जुगारत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात सारख्या राज्यांमधील शेकडो मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे शिरल्या आहेत. महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करुन या जहाजांवरुन मच्छीमारी केली जात आहे. परराज्यांमधून आलेल्या 427 हॉर्सपॉवरच्या क्षमतेपर्यंतच्या अनेक मासेमारी करणाऱ्या बोटी मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जयगडच्या हद्दीत मासेमारी करुन लाखो टन मासळी लुटून नेत आहेत. या मासळीची किंमत कोट्यवधी रुपयांची असल्याचं समजतं.
आधीच स्थानिकांना नैसर्गिक फटका त्यात हे नवं संकट
महाराष्ट्रामधील मच्छीमार व्यवसाय हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. मागील महिन्याभरात आलेली वादळं, जोरदार पाऊस, वारे, खराब हवामानामुळे अनेक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यातच आता स्थानिक मच्छीमारांसमोर अवैध मासेमारीचं आव्हान उभं राहीलं असून चिनी वर परप्रांतीय मच्छीमारांचा नवा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांना मोठं नुकसान होतं आहे.
चिनी जहाजं सुटतात कशी?
चीनच्या हजारो टन क्षमतेच्या 500 ते 600 भल्या मोठ्या फॅक्ट्री जहाजांनी राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली आहे. 200 सागरी नॉर्टीकल मैलाच्या आत 50 ते 100 मीटर लांबीच्या हजारो टनांची साठवणूक क्षमता असलेल्या मारेमारी करणाऱ्या जहाजांना ओळखणं नौदलालाही कठीण आहे. चीनच्या जहाजांना रंगेहाथ पकडल्यानंतरही त्यांना नेमकी कोणती कारणं देत सोडून दिलं जातं हे न उमगलेलं कोडं आहे.
…तरीही कारवाई नाही: स्थानिक मच्छीमारांचा आरोप
स्थानिक माच्छीमारांच्या दाव्यानुसार, घुसखोरी करणाऱ्या या बोटी व्हेसल ट्रॅकरवर दिसत असल्या तरी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या बोटींमधून स्थलांतरीत माशांची मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छीमारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती?
महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, हा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, बृहन्मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा किनारा लाभला आहे, तर सर्वात कमी किनारा मुंबईला लाभला आहे.
