मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? ईदची सरकारी सुट्टी सोमवारी, BMC म्हणते शुक्रवारीच, विद्यार्थी-पालक संभ्रमात

मुंबईत शनिवारी निघणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका लक्षात घेता शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका टाळण्यासाठी ईद सोमवारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने मुंबईत सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचे परिपत्रकही काढले. पण मुंबई महापालिकेने ईदची सुट्टी शुक्रवारी, 5 सप्टेंबरला जाहीर केली आहे. मुंबईतील शाळांच्या सुट्ट्यांबाबत महापालिका निर्णय घेते. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पत्रक काढूनही शाळा नेमक्या कधी भरणार, याबाबत पालक व शाळांमध्येही गुरुवारी गोंधळच होता.

सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार 8 सप्टेंबरला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्याचा आधार घेत शिक्षण उपसंचालकांनी पत्र प्रसिद्ध केले. मात्र मुंबई महापालिकेने याआधीच आज, शुक्रवारी सुट्टी जाहीर केली असल्याने या दोन्ही निर्णयांत तफावत निर्माण झाली आहे. या दोन परस्परविरोधी आदेशांमुळे गोंधळ निर्माण झाला असून शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थी यांच्यासमोर नेमका कोणाचा आदेश मानायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे.

आदेश वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर शाळांनाही अंतिम निर्णय घेणे कठीण झाले आहे. काही शाळांनी पालकांना आज, शुक्रवारी शाळा सुरू राहण्याची शक्यता वर्तवली तर काही शाळांनी अद्याप मौन बाळगले आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली असून ‘मुलांना उद्या शाळेत पाठवायचे की नाही,’ असे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबई मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष अनिल बोरनारे म्हणाले की, ‘मुंबई महापालिका आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या आदेशांत विसंगती आहे. यामुळे शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी एकत्रित व स्पष्ट आदेश तातडीने जाहीर होणे आवश्यक आहे. सुट्टीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाने त्वरित संवाद साधून गोंधळ निवळवणे गरजेचे आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *