काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचा चोख बंदोबस्त केल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्य़ावरून सुरू असणाऱ्या आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, या परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचं पालन होण्यासाठी म्हणून प्रशासनानं मोठा निर्णय घेत सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीनं सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहे.
मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलकांची उपस्थिती…
मराठा आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्याने सध्या असणारा पोलीस बंदोबस्त आणि त्यासाठी तैनात असणारे पोलीसही कमी पडत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबई पोलीस दलातील सशस्र पोलीस दल नायगाव येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पत्राद्वारे हा आदेश जारी करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंच्या आंदोलानाचं एकंदर स्वरुप आणि आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस ठेवणं गरजेचं असून त्याच धर्तीवर हा आदेश काढण्यात आल्याची माहिती मिळत समोर येत आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आंदोलनामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असल्यानं मुंबई पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी असतानाच मनोज दरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला आहे. शिवाय आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केल्यामुळं हे आंदोलन आणखी किती दिवस चालेल याची निश्चिती नसल्या कारणानं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
