उपमुख्यमंत्री एकवाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या प्रवाशांना टोल आकारला जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफीची घोषणा केली आहे. यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानंतर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात टोल माफी असणार आहेत.
येत्या 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
टोलमाफी कशी मिळेल?
यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण आणि शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात आणि सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.