मुंबईत कबूतरांना खाद्य पदार्थ टाकण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कबुतर खान्यावर ताडपत्री लावली आहे, ताडपत्रीनं संपूर्ण कबुतरखाना बंद करण्यात आला. यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारत दादरमधील कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिकेनं दादर कबुतरखाना बंद करण्याचं निर्णय घेतला आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मात्र आता माणसांपेक्षा कबुतरांचा कळवळा वाटू लागला आहे. कबुतरखाना बंद करू नका, या मागणीसाठी लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. कबूतरखाना बंद करताना पक्षीप्रेमी, साधू संत आणि नागरिकांची भावना समजून घ्यावी, अशी विनंती करणारं पत्र मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहीलं आहे.
कबुतरखाना कुठे स्तलांतरीत करावा?
– कबुतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात
– बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा
– दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा
– जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पक्षीप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा
मुंबई महानगरपालिकेनं दादरमधील ९२ वर्षे जुना कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे. दादरमधल्या कबुतरखान्यावर सध्या तात्पुरती ताडपत्री टाकण्यात आली आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होतेय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, असा आरोप आहे. अशा परिस्थितीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाना बंद करण्याला विरोध केला आहे.