मराठीत बोल नाहीतर राज ठाकरे येतील’, कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज अन् मुलाच्या डोक्यात घातली हॉकी स्टिक

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावरून सध्या वाद सुरू आहे. मराठीला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक भूमिका घेतेय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात आणि मराठीच्या सन्मानासाठी स्पष्ट भूमिका घेत राज्य सरकारला इशारा दिला. या पार्श्वभूमीवर राज्यभरात हिंदीसक्ती विरोधात निषेध नोंदवण्यात आला. असे असताना वाशीतील एका कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन मागहाणीपर्यंतचा धक्कादायक प्रकार घडला.

काय आहे नेमका वाद?

नवी मुंबईतील वाशी येथील एका कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप “मराठीत बोल, नाहीतर राज ठाकरे येतील” असा मजेशीर पण अंशतः धमकीवजा मेसेज टाकण्यात आला. हा मेसेज टाकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काही विद्यार्थी हिंदीत मेसेज टाकत होते. यावर एका विद्यार्थ्याने मराठीत, “मराठीत बोल, नाहीतर राज ठाकरे येतील” असा मेसेज टाकला.या मेसेजमुळे ग्रुपमध्ये वाद निर्माण झाला, जो पुढे खूप वाढत गेला

मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई?

दुसऱ्या दिवशी चार विद्यार्थ्यांनी मिळून संबंधित विद्यार्थ्याला मारहाण केली ज्यात फैजान नाईक याचाही समावेश आहे. त्या विद्यार्थ्याला कॉलेजबाहेर गाठून मारहाण करण्यात आली. फैजानने हॉकी स्टिकने त्या 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात वाशी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन गटांमधील वादामुळे ही घटना घडल्याची माहिती वाशीचे सहाय्यक पोलिस आयुक्त आदिनाथ बुद्धवंत यांनी दिली.

वादाची पार्श्वभूमी काय?

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावरून आणि हिंदीच्या कथित सक्तीविरोधात सध्या वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या अवमानाचा आरोप करत अनेक ठिकाणी लोकांवर हल्ले केले आहेत, ज्यात ठाण्यातील एका दुकानदारावर आणि नांदेडमधील सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ल्याचा समावेश आहे.या घटनांमुळे मराठी भाषेच्या सक्तीवरून आणि हिंदी-मराठी वादावरून महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे आणि व्यवहारात वापरणे आवश्यक असल्याची भूमिका मनसेनं मांडलीय. यासंदर्भात, मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरुद्ध आंदोलने केली, काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडल्या. यामुळे सामाजिक तणाव वाढला असून, राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. ज्यात त्यांच्या भाषणांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा आदर करावा, पण हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले असले, तरी “जर कोणी नाहक ड्रामा केला, तर त्यांना कानाखाली ठेवून द्या” असेही म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *