साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून वधूला कारने पळवून नेल्याचा आरोप आहे.
नेमकं काय घडलं?
मोहाडी उपनगरातील कुटुंब मुलाच्या साखरपुड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. साखरपुड्यानंतर ठरलेल्या वधूसह कुटुंब रात्री घराकडे निघालं. वेरूळ घाटात चारचाकी जाताच अज्ञात तिघा जणांनी तलवार आणि कोयत्यांनी वाहनावर हल्ला केला.
वाहनातील सदस्यांना गंभीर जखमी करून हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने गाडीत बसवून पळून गेले. घटनेनंतर हल्ला झालेल्या वाहन खुलताबाद पोलीस करण्यात आले असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. पियुष बटू पाटील हा 4 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. तर कैलास कृष्णा शिंदे हे देखील जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहाडी उपनगरातील एक कुटुंब साखरपुड्यासाठी एम.एच.18 बी.आर. 2518 या क्रमांकाच्या वाहनाने छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात गेले होते. नियोजित साखरपुडा दुपारी पार पडला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास कुटुंब ठरवलेल्या वधूसह घराकडे निघाले होते.
रात्री दहा वाजताच्या सुमारास वाहन वेरूळ घाटात पोहोचले. यावेळी अज्ञात तीन हल्लेखोरांनी वाहनावर तलवार व कोयत्याने हल्ला केला. यामध्ये वाहनातील चार वर्षाचा पियुष पाटील हा गंभीर जखमी झाला. तर कैलास शिंदे हे देखील जखमी झाले. वाहनातील इतर सदस्यांना इजा झाली नाही. हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून पळून नेले.
प्रेम प्रकरण, वैयक्तिक वाद, ही दुश्मनी?
नियोजित साखरपुडा पार पाडून कुटुंबीय माघारी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर नववधूला बळजबरीने पळवून नेले. हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता? प्रेम प्रकरण? का जुनी दुश्मनी? हे कळू शकले नाही. घटनेनंतर हल्ला झालेले वाहन खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत.
