सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने नाले, नद्या, डोह, धरणं मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. अशात पावसाळी सहलीसाठी निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढते आहे. या गर्दीत पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट येतो. अतिउत्साहात एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं होऊन दुर्दैवी घटना घडते.
नेमकं काय घडलं?
अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा रेषेवरील वारी हनुमान धरण हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. इथे नेहमीच भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशाच पर्यटनासाठी वारी हनुमान धरण इथे तीन मित्रांसह एक तरुण आला होता. तेल्हारा येथून आलेला 23 वर्षे तरुणासोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली. तरुणाचा राजन्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी, 11 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र शोकळा पसरली आहे. वारी आणि अरनदीचा संगम होत असलेल्या अरनदीच्या राजन्या डोहात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अक्षय सिद्धार्थ भोजने असं आहे. तेल्हारा जिल्हा अकोला येथील तो रहिवासी आहे. त्याचे मित्र प्रेम महेंद्र डोंगरे, रवींद्र गजानन पोहनकर, राहुल रवींद्र विरघट, सर्व राहणार तेल्हारा या मित्रांसह दहा वाजता तो दर्शनासाठी वारी हनुमान येथे आला होता.
नंतर मंदिरालगत अरनदी पात्रात दुपारी दोन वाजेच्या सुमारात नदीच्या उंच कड्यावरुन अक्षयने रांजण्या डोहात पोहण्यासाठी उडी घेतली. पोहण्यासाठी उतरलेला अक्षय बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही. तो बाहेर न आल्याने वारी येथील नागरिकांनी त्याचा नदीत शोध सुरू केला. बराच वेळानंतर तो नदीत बुडून मृतावस्थेत असल्याचं दिसून आलं. त्याला मृतावस्थेत बाहेर काढण्यात आलं
