पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे वाढवण बंदर, अगदी बंदुकीच्या वेगाने धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा रस्ता असे अनेक डोळे दिपवणारे प्रकल्प एकीकडे होत असताना आता मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना निरगुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर येत असून किमान एक किमीच्या आसपास असलेला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
अक्षरश: पाण्यातून, चिखलातून येथील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. ‘आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या’, अशी भावनिक साद येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे.
ठाकूरवाडी येथील तब्बल १५ ते २०विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत दररोज चालत जातात किमान १ ते दीड किमी अंतर असेल यामुळे याठिकाणी बससेवा सुरू असल्याचा संबंध नाही. याशिवाय जिथे चालायला रस्ता नाही तिथे बस जाईल तर कशी, यामुळे मग आपले दप्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. यामुळे ही वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज जावे लागते. याशिवाय रस्त्यावर पाणी असल्यामुळे भिंतीवरून जाण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर येते. उडी मारत असताना एक विद्यार्थी पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पावसाळ्यात या रस्त्यामुळे आम्हाला काम सोडून दररोज मुलांसोबत शाळेत जावे लागते. रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील. मात्र अशीच स्थिती राहिली तर आम्ही पावसाळाभर मुलांना शाळेत पाठविणार नाही. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयात शाळा भरवली जाईल. -कैलास बुरुंगे, ग्रामस्थ, ठाकूरवाडी
