पाऊस थांबला, पूर कायम! नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्ध्यात भीषण परिस्थिती, घरं पाण्याखाली, पूल वाहून गेले

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी; बुधवारीही गोसे खुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे सुरूच असल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे आठ आणि वर्धा जिल्ह्यातील लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणांमधून विसर्ग वाढल्याने नदी, नाल्यांवरील पूल पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडोंचे संसार उघड्यावर आले आहेत.

भंडाऱ्यात ८० मार्ग बंद

भंडारा जिल्ह्यात पुरामुळे ८० रस्त्यांवरील वाहतूक थांबली आहे, तर दुसरीकडे बावनथडी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने महाराष्ट्र-मध्य प्रदेशदरम्यान वाहतूक सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे देवरी तालुक्यातील ककोडी-चिचगड मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरात पर्यायी पूल वाहून गेला. या घटनेमुळे ककोडी-चिचगड मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

पुजारीटोला धरणाची पाणीपातळी वाढल्याने आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूरपरिस्थिती वाढून जिल्ह्यातील डवकी-शिलापूर-फुकीमेटा, मुझरदोली-चिचेवाडा, बोंडे-घोनाडी, फुटाणा-हळदी, पळसगाव-तुमडीमेढा हे मार्ग बंद पडले आहेत. गोसे खुर्द प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बिकट झाली आहे. तब्बल वीस मार्गांवरील वाहतूक थांबली आहे. अनेक गावांसोबतच पाच तालुक्यांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे. सलग दुसऱ्या दिवशी, बुधवारी पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली-नागपूर संपर्क तुटलेलाच होता.

चामोर्शी-गडचिरोलीदरम्यानचा पूल गोविंदपूर नाल्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाल नदी आणि गोविंदपूर नाल्याजवळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. साखरा, वडसा आणि आष्टीजवळ वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. देसाईगंज आणि कुरखेडा उपविभागाला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. कुरखेडा-वैरागड, कडोळी-उरळी, चातगाव-रांगी पिसेवाडा हा प्रस्तावित जिल्हा मार्ग बंद पडला आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर-जोगी साखरा-कोरेगाव चोप, आष्टी-उसेगाव कोकडी यासह जिल्ह्यातल तब्बल वीस मार्ग बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिली आहे.

पूरग्रस्तांना हलविले

सततच्या पावसामुळे भंडारा शहरानजीकच्या भोजापूर येथे काही कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. बचाव पथकाने तत्काळ धाव घेत या कुटुंबांना बोटीच्या साह्याने सुरस्थितस्थळी हलविले. भोजापूर येथील काही भाग पूरग्रस्त असूनही बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी सातत्याने केली जाते; परंतु त्यांचे पुनर्वसन केले जात नसल्याने दर वर्षी आम्हाला पुराचा सामना करावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रिया बाधित कुटुंबांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्यामुळे भोजापूर येथील रस्त्यावरील पूल बुधवारी सकाळी वाहून गेला. जानेवारी महिन्यात या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.

ब्रह्मपुरीत शाळांना सुट्टी

चंद्रपूरमध्ये पूर कायम असल्याने ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी, वरोरा, सावली आणि नागभीड अशा पाच तालुक्यांतील ४६ रस्ते बंद झाले होते. दरम्यान, पुरात अडकलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव येथील ११ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील शाळांना आज, गुरुवारी सुट्टी देण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्यात पुराचा फटका

वर्धा जिल्ह्यात यशोदा नदीला पूर आल्याने काठावरील गावांना फटका बसला. पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल २६ लहान-मोठे मार्ग बंद होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *