मुंबईमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन 9 हजार झाडांची वृक्षतोड करण्याचा डाव फसला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे झाडं पाडण्याच्या प्रयत्न असलेल्या एका जेबीसीवरील दोन व्यक्तींना हे कृत करताना रंगेहात पकडलं आहे. या प्रकरणावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
नेमकं रात्री घडलं काय?
मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय परिसरात एक वर्षापूर्वी मियावकी पद्धतीने लावलेली 9 हजार झाडे लावली गेली होती. जी मध्यरात्री तोडली जाणार होती. यासाठी दोन व्यक्ती जेसीबीसहीत पोहचलेही होते. या व्यक्तींनी संरक्षक भिंत तोडून झाडे जमीनदोस्त करायला सुरूवात केली. मात्र तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनिष मोरजकर यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहचले. झाडे तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंचं म्हणणं काय?
मुंबई महापालिकेच्या गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केलीय. आयटीआय परिसरातील 9 हजार झाडांचे अर्बन फॉरेस्ट तोडण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता हे समोर आले नसले तरी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा हात असल्याचा आरोप केला आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी हिंदूस्थान पेट्रोलियमच्या सीएसआर फंडातून लावण्यात आलेली झाडे तोडून त्याठिकाणी स्विमिंग पूल बांधणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. कारण अशाप्रकारे शहरात लावण्यात आलेली जंगलं नष्टं केली तर त्याचा मुंबईवर दिर्घकालीन परिणाम होईल. तसेच मागील वर्षा लावण्यात आलेलं जंगल तोडण्यात कोणताही अर्थ नाहीये,” असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.
विधिमंडळातही गाजणार हा मुद्दा
आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाच्या कामकाजामध्ये विधिमंडळातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
