दोन वर्षांपूर्वी आई गेली, आता लेकाचं हृदयद्रावक कृत्य… रत्नागिरीत दहावीतील विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

मागील काही काळात आत्महत्या करण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मोठ्यांसह अनेक अल्पवयीन मुलं देखील टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवत असल्याचं भयंकर चित्र समोर आहे. अशीच एक धक्कादायक घटना खेड तालुक्यात कळंबणी येथे समोर आली आहे. नुकतीच दहावी पास झालेल्या आणि तब्बल ७८ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांने ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अंकुश मनोहर जोशी (वय १६, रा. कळंबणी बुद्रुक जोशीवाडी) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दहावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अंकुश याने इयत्ता अकरावीमध्ये खेड शहराजवळ असलेल्या भरणे येथील नवभारत स्कूलमध्ये ऍडमिशनही घेतलं होतं. त्याने उचललेल्या या टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक जोशीवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. अल्पवयीन अवघ्या १६ वर्षीय तरुणाने कोकण रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेन खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे. ही दुर्दैवी घटना २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेने जोशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

कळंबणी बुद्रुक जोशीवाडी गावात रेल्वे फाटकाजवळ दुर्दैवी घटना घडली. तरुणाने समोरुन येणाऱ्या ट्रेनखाली त्याने अचानक उडी घेतल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्यातच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थीदशेत असलेल्या या मुलाच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

खेड पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. अंकुशने उचललेल्या या टोकाच्या पावलाने, आत्महत्येमुळे जोशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अंकुशच्या आईचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं आहे. अंकुशच्या पश्चात वडील, दोन शिक्षण घेत असलेल्या बहिणी, काका – काकी असं कुटुंब आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबणी बीट अंमलदार गोरे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *