गोल्डन अवर वाया; १९ दिवसांत १०० प्रवाशांचा मृत्यू, मुंबई रेल्वेवरील धक्कादायक आकडेवारी

मुंबई उपनगरी रेल्वेमधून (लोकल) पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या मुंब्रामधील घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शुक्रवारी सकाळी धावत्या लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याहून धक्कादायक म्हणजे तो बराच वेळ उपचारांविना तसाच पडून होता.

दुसरीकडे मागील १९ दिवसांत मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत शंभर प्रवाशांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे आणि गोल्डन अवर पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाने न्यायालयात केलेले दावे फोल ठरल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ९ जून रोजी सकाळी धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. त्याच दिवशी विविध रेल्वे स्थानकांच्या हद्दीत आणखी आठ प्रवाशांचाही मृत्यू झाला होता.

मुंब्राच्या दुर्घटनेनंतर लोकल प्रवासादरम्यान जखमी झालेल्या किंवा तातडीचे वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपचारांच्या व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. जवळपास एक दशकापूर्वी दिव्यांग समीर झवेरी यांच्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हाच विषय न्यायालयासमोर होता. त्यावेळी कोणत्याही अपघात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा जीव वाचावा यादृष्टीने ‘गोल्डन अवर’ म्हणून समजला जाणारा पहिला तास महत्त्वाचा असतो, याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर, लोकल प्रवासादरम्यान जखमी होणाऱ्या प्रवाशांवर उपचार करायचे असल्यास प्रवासी तिकिटात ‘गोल्डन अवर सेस’ हा अधिभार लावण्याचा अजब प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला होता. त्याबद्दल उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढले होते. शिवाय प्रत्येक रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याचे आणि जखमींचा जीव वाचवण्यासाठी ‘गोल्डन अवर’चे पालन करण्याच्या दृष्टीने स्थानिक रुग्णालयांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. अनेक महिने चालढकल केल्यानंतर रेल्वेने असे उपाय केले आणि ‘गोल्डर अवर’ पाळण्याची हमीही दिली. मात्र, आता ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा व अन्य अनेक स्थानकांतील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष बंद अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्याचबरोबर ‘गोल्डन अवर’चे पालन होत नसल्याचेही प्रकर्षाने समोर येत आहे.

गांभीर्य नसल्याची विदारक स्थिती
मुंब्रा घटनेनंतरच्या १९ दिवसांत लोकल-एक्स्प्रेसमधून पडून, रेल्वेची धडक लागून, दीर्घ आजारपणामुळे, हृदयविकाराच्या झटक्याने, चक्कर येऊन, अशा वेगवेगळ्या कारणांखाली १०० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यात शुक्रवारी सकाळी कळवा व मुंब्रामधील वळणावर झटका बसल्याने आणि गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून मरण पावलेल्या मोहम्मद अयान जब्बार अली शेख या २१ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तो गंभीर जखमी अवस्थेत बराच वेळ तसाच पडून राहिला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले नाही. मुंब्य्रामधील भीषण दुर्घटनेनंतरही खबरदारीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे विदारक चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *