सासूबाई येते हं! माहेरी जाण्याची थाप, ‘नाशिक’ची नववधू विवाहित ‘आशिक’सोबत उडन छू!

विवाहानंतर परतमुळासाठी माहेरी गेलेली नववधू सासरी न परतता विवाहित प्रियकरासोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे उघडकीस आली. या प्रकरणी सासरकडील व्यक्तींनी नववधूचा प्रियकर गौतम बापू आहिरे याच्यासह तिचे आई-वडील आणि काही नातेवाइक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लग्नानंतर नववधू सासरच्या मंडळींसोबत व्यवस्थित वागत असल्यामुळे कोणाला संशय आला नव्हता, मात्र चारच दिवसात लग्नानंतरच्या विधींसाठी माहेरी गेलेली विवाहिता बरेच दिवस उलटूनही परत येत नसल्यामुळे खोदून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील रावळगाव (ता. मालेगाव) येथील तरुणीचा सटाण्यातील तरुणाशी 17 जून रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर मीना माहेरी गेली. विवाहावेळी व त्यानंतरही विवाहिता सासरकडील व्यक्तींशी व्यवस्थित वागली. माहेरी जाताना तिने सोबत सर्व दागिने, महागडे कपडे नेले.

तीन-चार दिवस उलटल्यानंतर तिचा पती तिला घेण्यासाठी गेला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे खोलवर विचारपूस केली असता ती सर्व ऐवज घेऊन विवाहित प्रियकर गौतमसोबत पळून गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *