इटलीमधील फॅशन शोमध्ये प्राडा (Prada) नावाच्या कंपनीने चक्क कोल्हापुरी चपलेची हुबेहुबू नक्कल केल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक संतापले आहेत. कंपनीने कोणतंही श्रेय न देता कोल्हापुरी चपलेची चोरी करणं सर्वांनाच खटकलं आहे. कोल्हापुरात याविरोधात संतापाची लाट उसळली असून, आपली नाराजी व्यक्त केली जात आहे. एक हजारांपर्यंत मिळणारी ही चप्पल कंपनी एक लाखांमध्ये विकत असल्याचं सांगितलं जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
“प्राडा (Prada) नामक विदेशी फॅशन ब्रँडने नुकतीच कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली आहे. या कंपनीने कोल्हापूरी चप्पलचा उगम, इतिहास, कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला, किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही. ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे,” असा संताप संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला आहे.
“राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली. कोल्हापूरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले आहेत की, “कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्यासोबत त्या चपलेची मूळ ओळख देखील पोहोचावी, शेकडो वर्षे ही कला ज्यांनी जोपासली, टिकवली, वाढवली व विकसित केली त्या कारागीरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, त्या कलाकृती मागील संस्कृती, वारसा व परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरी चप्पलला 2019 साली GI मानांकन मिळाले आहे. या GI मानांकनाच्या अधीन राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीने कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आंनदही व्यक्त केला असता, मात्र सरळसरळ डिझाईन कॉपी करून, चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करणे हे कृत्य “सांस्कृतिक अपहार” चे मोठे उदाहरण आहे”.
“सोशल मीडियावर देखील देशभरातून यावर पडसाद उमटत आहेत, मात्र PRADA कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कंपनीने आपली चूक वेळीच सुधारून कोल्हापुरीची अस्सल ओळख न लपविता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणले तर आम्ही स्वागतच करू,” अशी आपली भूमिका त्यांनी मांडली आहे.
“शेकडो – हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची, कलाकृतींची अशी नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारविण्यास भाग पाडले पाहिजे. भारतीय संस्कृती व परंपरेशी जोडलेले कोणतेही अस्सल भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर जात असताना त्याची मूळ ओळख टिकून रहावी व त्या उत्पादनासोबतच भारतीय संस्कृती व परंपरा देखील जागतिक स्तरावर पोहोचावी, हाच यामागचा उद्देश आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.