मुंबई पोलिसांनी करुन दाखवलं! मुंबई शहर भोंगामुक्त, धार्मिक स्थळांवरील 1500 भोंगे उतरवले

राज्यात काही काळापूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकारण पेटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. भाजपाची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेशातही योगी सरकारने हा मुद्दा उचलून धरत कारवाई केली होती. दरम्यान मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, शहरातील वेगवेगळ्या धर्मांच्या 1500 वास्तूंवरचे भोंगे उतरवले आहेत. विशेष म्हणजे यामुळे मुंबई शहर भोंगामुक्त झालं आहे. मुंबईसारखे महानगर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांपासून मुक्त होण्याची ही पहिली वेळ आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठिंबा आणि पोलीस दलाची इच्छाशक्ती याच्या माध्यमातून मुंबईतील 1500 धार्मिक स्थळांवरील भोंगे मुंबई पोलिसांनी उतरवले आहेत. राज्यासह देशात मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून सातत्याने वाद होत असताना मुंबई पोलिसांनी अशक्य अशी गोष्ट करुन दाखवली आहे. मुंबईतल्या कुठल्याही धार्मिक स्थळावर एकही भोंगा उरलेला नाही. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली.

एकीकडे भोंग्यांवरुन सतत वाद होत असताना, मुंबई पोलिसांनी कोणताही गाजावाजा न करता ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे मागील दोन महिन्यांपासून अत्यंत शांततेत पडद्यामागे राहून मुंबई पोलिसांनी ही मोहीम राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज स्वतः याचा आढावा घेत होते. अडथळे निर्माण करणाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस स्वत: बोलत होते.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी या विषयाला राजकीय रंग येऊ न देता सामोपचाराने विषय मार्गी लागेल यासाठी प्रयत्न केले, तसंच सामाजिक सलोखा कायम राहील याकडेही लक्ष दिले. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. तसंच विरोध न होता सर्व धार्मिक स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यास सहकार्य केलं असल्याचंही देवेन भारती यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *