गणेशोत्सवासाठी नाणार-इंगळवाडी या गावी आलेला मुंबईस्थित तरुण दीपक केशव चिंदरकर (३०) हा २४ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नाटे पोलिसात दिली आहे. गावाकडून मुंबईला जाण्यासाठी निघालेला हा तरुण अद्याप मुंबईत पोहोचलाच नाही.
दीपक हा आपल्या आईवडिलांसोबत मुंबईत राहतो. गावी त्याचे चुलते व अन्य नातेवाईक राहतात. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तो १६ सप्टेंबर रोजी आपल्या मूळ गावी नाणार-इंगळवाडी येथे आला होता.
गणेशोत्सव आटोपून तो २४ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५ च्या गाडीने गावातून मुंबईला जाण्यासाठी निघाला, मात्र तो अद्याप मुंबईत पोहचलेला नाही.
याबाबत दीपक याच्या पालकांनी त्याचा मुंबईतील नातेवाईकांकडे व मित्रांकडे शोध घेतला असता तो कुणाकडेही आलेला नसल्याचे सांगण्यात आले. दीपकबाबत माहिती मिळाल्यास ९४२३२९६७६३ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

