पुढील चार ते पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या काळात 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. भरतीच्या वेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. सर्वाधिक उंचीच्या लाटा या 26 जून रोजी उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नये अशा सूचना देखील मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत. पालिकेने दिलेल्या सूचनाचे पालन करावे असं आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना केलं आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात कोकणात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी कोकण आणि मध्य घाट भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आपल्यासोबत रेनकोट किंवा छत्री जवळ ठेवावी. त्यासोबत विनाकारण बाहेर पडू नये.
‘या’ 4 जिल्ह्यांवर महापुराचं संकट
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.