‘त्रास होत असेल तर मग बॅग भर आणि परत जा’, शिंदेंच्या आमदाराचा अबू आझमींना इशारा

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. यावर आमदार अमोल खताळांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “अबू आझमी तुला त्रास होतोय तर मग तुझी बॅग भर, तिकीट काढ आणि परत जा..” अशा शब्दांत आमदार खताळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

वारी आणि नमाजाच्या गर्दीची तुलना करताना आझमी यांनी वारीतील पालख्यांमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य केले. यावर चांगलच वादंग निर्माण झाला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी ट्विट करून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अबू आझमी नीट लक्षात ठेव, वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे.पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पावसाची सर झेलत, पायी चालत असतात. ट्रॅफिक जॅम सोड, एक ॲम्ब्युलन्स जरी आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात. ही आमची परंपरा आहे.”

तसेच आमदार खताळ पुढे म्हणाले,” अबू आझमी तुला त्रास होतोय तर मग तुझी बॅग भर, तिकीट काढ आणि परत जा..बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या तुमच्यासारख्या भैय्याना आमच्या ‘वारी’ वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि लक्षात ठेव, आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात आहे, हे विसरू नकोस!” अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी खरपूस समाचार घेतला.

अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *