विदर्भातील बहुतांशी शाळा आजपासून सुरू झाल्या असल्या तरी नागपूरसह विदर्भातील शेकडो शाळांमध्ये आज (23 जून) शुकशुकाटही पाहायला मिळत आहे. काही शिक्षण संस्था चालकांनी आज एका दिवसासाठी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी त्यांच्या शाळा सुरू केलेल्या नाही. शाळांना सरकारकडून मिळणारा वेतनेतन अनुदान गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पद्धतीने दिला जात आहे. आरटीई अंतर्गत मिळू शकणारा शेकडो कोटी रुपयांचे अनुदान थकलेलं आहे. तसेच शाळा चालवण्यासाठी आवश्यक असलेला इतर खर्चही सरकारकडून दिला जात नाही.
त्यामुळे शाळा चालवणे शिक्षण संस्था चालकांसाठी कठीण होऊन बसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने आज एका दिवसासाठी शाळा बंद ठेवण्याचा आवाहन केला होता, त्याला प्रतिसाद म्हणून आज नागपूरसह विदर्भातील शेकडो शाळांनी त्यांच्या शाळा एका दिवसासाठी बंद ठेवल्यामुळे पहिल्या दिवशी शाळा भरू शकलेली नाही.
अनुदान थकवलं तर शाळांनी कारभार चालवावा कसा ?
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच आणि सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. सतत अनुदान थकवलं जाईल तर अनुदानित शाळांनी कारभार कसा चालवावा? असा प्रश्न शिक्षण संस्था चालकांनी विचारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ही या एक दिवसीय शाळा बंद ठेवण्याचे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, आमचे हे सर्व आर्थिक प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत आमचा शासनाची लढा सुरू राहील आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही विदर्भातील शाळा 23 तारखेला न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 जून रोजी किती शाळा बंद राहणार तो आकडा आम्ही सांगू शकत नाही, मात्र महामंडळाशी जोडलेला सर्व शाळा याच्यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास असल्याचे शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले. शाळा उघडल्या नाही तर सरकार आमच्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करेल. जर आमचे मागण्यांकडे लक्ष घातले नाही तर पुढील महिन्यात आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा विचार करत आहोत. असेही फडणवीस म्हणाले.
शिक्षण मंत्री दादा भुसे करणार बुलढाण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र आज पासून सुरू होत आहे त्यामुळे शाळेचा आज पहिलाच दिवस. शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज बुलढाणा जिल्ह्यातील सीनगाव जहांगीर या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा स्वागत करत आहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्येही खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री आपलं स्वागत करायला येणार असल्यामुळे मोठा उत्साह बघायला मिळत आहे. यासोबतच शाळा सजवण्यात आली असून गावातील नागरिक व शिक्षकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत आहे.