मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी प्रशासनाकडून अनेक पर्याय राबवण्यात येतात. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यांत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे दिल्या आहेत.
मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्याचे सादरीकरण सोमवारी करण्यात आले. मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी मोठ्या संधी आहेत. विशेषत: बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. जास्तीत जास्त प्रवासी असणाऱ्या आणि फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरविताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.