रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी सलग पाचव्या दिवशी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजापुरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अर्जुना आणि कोदवली या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मोठ्या पुलावर पाणी आल्यामुळे राजापूर स्टेशनकडे जाणारा मार्ग बराच वेळ बंद होता. लांजा तालुक्यातील वखेड घाटात सकाळी दरड कोसळली लगतची संरक्षक भिंतही कोसळली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
संगमेश्वर तालुक्याला पावसाने झोडपले असून, शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. आमकरवाडीतील डोंगर खचल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गुहागर व चिपळूणमध्येही पाण्याची पातळी वाढल्यामुळे सखल भाग जलमय झाला होता.
दरम्यान, मुंबईमध्ये २६ मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनचा पुढचा प्रवास रेंगाळला होता. अखेर २० दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील मान्सूनरेषा पुढे सरकली आहे. दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाल्यानंतर सोमवारी मान्सूनने उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग व्यापला. सध्या मान्सून सक्रिय असल्याने मुंबई आणि दक्षिण कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सूनने सोमवारी गुजरातचाही काही भाग व्यापला.