मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर मागील जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. नांदेडमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात अतिशय दुर्दैवी घटना घडली. नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा चिमुकला आपल्या आई आणि आजी – आजोबांसमोर वाहून गेला. या घटनेत चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतचे इतर चार जण थोडक्यात बचावले.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ परिसरात गुरुवारी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने किनवट तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अभिनव गजेंद्र गुमुल (वय ५) असं नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.
बैलगाडीतून घरी निघाले होते
किनवट तालुक्यासह शिवणी, इस्लापूर परिसरात मागील दोन, तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यातच १२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अप्पारावपेठ गावालगतच्या नाल्याला पूर आला. यावेळी शेताकडून बैलगाडी घेऊन शेतकरी गजव्वा गुमुल, लक्ष्मीबाई गुमुल, रुखमाबाई हळदे, लक्ष्मीबाई देशमुख हे ५ वर्षाचा चिमुकला अभिनव गजेंद्र गुमुल यासोबत घराकडे येत होते.
बैलगाडी पुरात उलटली आणि चिमुकला वाहून गेला
नाला पार करताना बैलगाडी पुरात उलटली. बैलगाडी उलटल्याने गाडीतील पाचही जण पाण्यात पडले. यात चिमुकला अभिनव पाण्यात वाहून गेला. तर इतर ४ जण कसेबसे पाण्याबाहेर आल्याने थोडक्यात बचावले. सदरील घटना अप्पारावपेठ गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेत बालकाचा नाल्यात शोध सुरू केला. तब्बल दोन तासानंतर त्या बालकाचा मृतदेह सापडला.
घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी उमेश भोसले यांना कळवताच उपनिरीक्षक अतुल डाकेसह बीट अंमलदार पठाण आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती किनवट तहसीलदार शारदा चौंढेकर यांना कळवण्यात आली. महसूल आणि पोलिस प्रशासनाची कारवाई चालू होती. या दुर्देर्वी घटनेमुळे अप्पारावपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.