शाब्बास रं सत्यवाना! रस्त्यांच्या खड्ड्यात वड रोवला अन् तरुणाने दोर बांधून कल्लाच केला, जिल्हाभर कौतुक, पण प्रशासनाला जाग येणार का?

रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या खड्ड्यांकडे जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही, असा आरोप आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलिबागच्या काही तरुणांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी खड्ड्यात वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. या अनोख्या आंदोलनाची चर्चा रायगड जिल्ह्यात होत आहे.

वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. पण अलिबागमध्ये परिस्थिती वेगळी होती. खड्ड्यांमुळे सत्यवानाचा जीव धोक्यात येत होता. त्यामुळे सावित्रीऐवजी सत्यवानानेच खड्ड्यात वडाचे झाड लावले. आपल्या पत्नीच्या सौभाग्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने वडाला फेऱ्या मारल्या. यामुळे तरी जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभाग जागे होतील, अशी अपेक्षा अलिबागकरांनी व्यक्त केली आहे.

गेली अनेक वर्षे या रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि महिला जखमी झाले आहेत. रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे खड्ड्यात अपघात झाल्यास मागून येणाऱ्या मोठ्या वाहनाखाली येऊन जीव जाण्याची शक्यता आहे. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली आहे. पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी याच रस्त्यावरून ये-जा करतात. ते फक्त खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करतात. काही दिवसांनी रस्ता पुन्हा उखडून खड्डे पडतात.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक आणि सिंडिकेट ग्रुप ऑफ अलिबाग यांनी स्वतःच्या खर्चाने रस्ता दुरुस्त करण्याची तयारी दर्शवली आहे. पण संबंधित खाते त्यांना परवानगी देत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. आज तरुणांनी खड्ड्यात वडाचे झाड लावून अनोखे आंदोलन केले. खड्ड्यात पडून अपघात होऊ नये, यासाठी आणि सावित्रीचे सौभाग्य टिकावे, यासाठी त्यांनी वडाला प्रदक्षिणा घातली.

“या मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत तो रस्त्याचं भाग सार्वजनिक बांधकाम विभाग की राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारित येतो आहे याची माहिती खुद्द जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने हे खड्डे कायमचे बुजवले जात नसल्याचे सांगण्यात आले.” अलिबागच्या नागरिकांनी प्रशासनाच्या ढिलाईवर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच या खड्ड्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *