ठाणे- बोरिवली बोगद्यासंदर्भात मोठी अपडेट, ठाण्यातील या रहिवाशांना मिळाला मोठा दिलासा

ठाणे-बोरिवली ट्विन बोगद्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकल्पामुळं ठाण्यातील मुल्लाबागयेथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील पाच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी   मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत एक बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीत मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या मागणीनुसार  हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. तसे केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसेच धुळीचा त्रास होणार नाही. तसेच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्याने तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल.

कसा आहे ठाणे-बोरीवली बोगदा

ठाणे-बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून 11.85 किमी लांबीच्या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गावर 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. नॅशनल पार्कच्या पोटातून हे दोन बोगदे जाणार आहेत. जून 2023मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहेत. या बोगद्यामुळं ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसंच, घोडबंदरची वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *