जे महाराष्ट्राच्या मनात ते होणारच! उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘तुमच्या मनात…’

उद्धव ठाकरेंनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार असं सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयारीच दर्शवली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या चर्चेला बळ मिळालं आहे. उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मनेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसंच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”. इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला.

मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मनसेची प्रतिक्रिया

“आम्ही कालच पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. ज्यावेळी एखादी ठोस गोष्ट होईल, एखादा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे त्यासंदर्भात निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014, 2017 मध्येही होती. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, जनतेच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे,” असं संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *