यंदा मान्सूनने वेळेआधीच एन्ट्री केली आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळतच आहेत. सर्वसामान्य माणसाची तारांबळ तर उडालीच आहे पण प्राण्यांचीही ‘गैरसोय’ झाली आहे. अशातच मुंबईच्या बीकेसी परिसरातून एक भीतीदायक घटना समोर आली आहे. बीकेसीतील सेबी भवनात अजगराची पिल्ले सापडली आहेत. शनिवार ते बुधवार या पाच दिवसांत एक-दोन नव्हे, तर अजगराची तब्बल १२ पिल्ले मिळाली आहेत.
पावसाळा सुरू झाल्यामुळे सापांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढला आहे. बीकेसी परिसरात शनिवार ते बुधवार या पाच दिवसांत अजगराची १२ पिल्ले सापडली, ज्यापैकी एका पिल्लाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला. वापरा संस्थेला मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बीकेसी सेबी भवनात अजगराची पिल्ले रस्त्यावर फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सर्पमित्र आणि वन विभागाच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले.
दरम्यान, बीकेसी परिसरात अजगरांची पिल्ले सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वापरा संस्थेला मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बीकेसी सेबी भवनात अजगराची पिल्ले रस्त्यावर फिरत असल्याचा फोन आला. संस्थेने तातडीने वन विभागाचे रांउड अधिकारी रोशन शिंदे व मुंबई रेंज कंट्रोल यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यावर सर्पमित्र अतूल कांबळे व माहीम पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सर्पमित्र पोलीस कॉन्स्टेबल सचीन मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पकडलेल्या अजगरांच्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
गेल्या शनिवारी पहिला साप आढळल्याचा कॉल आला होता. त्यावेळी सदर सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांना आधी चार अजगरचे पिल्ले मिळाली होती. त्यांनी ती मिठी नदीच्या आवारात असलेल्या खार-फुटीच्या खाडीत सोडली. शनिवारी सापडलेली चार पिल्ले सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांनी मिठी नदीच्या खाडीत सोडली होती. सर्पमित्र मंगळवारी बीकेसी येथे गेले असता पहिले पिल्लू हे सेबी भवन बाहेर पादचारी मार्गावर मिळाले. त्याला रेसक्यू करून सर्प मित्राने आजू-बाजूचा परिसर सर्वे केला. त्यादरम्यान रस्त्यावर अजगराचे एक पिलू गाडी खाली आल्यामुळे मृत अवस्थेत दिसले.
शनिवारी जिथे साप आढळला त्याचठिकाणी दगडाखाली दूसरा, गटाराच्या चेंबर मध्ये तीसरा,तर सेबी भवनासमोरील गार्डनाला उभारलेल्या लाद्यांमध्ये चौथा अशी एकूण ५ अजगरांची पिल्ले रात्री दीड-पावणे दोन वाजेपर्यंत सापडली. पोलिस हवालदार मुरलीधर जाधव यांनी सकाळी एक अजगराचे पिल्लू रेसक्यू केले. बुधवारी दुपारी याठिकाणी एक पिल्लू मिळाले, अशी एकूण अजगराची १२ पिल्ले मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ५, मंगळवारी ६ आणि बुधवारी १ अजगराचे पिल्लू सापडले. दरम्यान, या घटनेनंतर सर्पमित्र अतुल कांबळे यांनी नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. “रहिवाशांनी या भागात रस्त्यावर वाहने उभी करू नयेत किंवा अडचणीच्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत. तसेच कोणत्याही सापाला पकडू नये. साप आढळल्यास जवळील सर्पमित्र किंवा वन-विभागाशी संपर्क साधून सापाची माहिती द्यावी.” असे कांबळे म्हणाले.
बीकेसी परिसरात सापडलेल्या अजगरांच्या पिल्लांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग आणि सर्पमित्र यांच्या मदतीने या सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.