पुणे जिल्ह्यात आतापर्यंत दोन महिन्यांत सुमारे २२ हजार सातबारे जिवंत

राज्यात सातबाऱ्यावरील मृत व्यक्तींच्या नोंदी काढून त्याऐवजी त्यांच्या वारसांच्या नोंदी लावण्यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू आहे.
त्या मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत दोन महिन्यांत सुमारे २२ हजार सातबारे आढळले असून, त्या सातबाऱ्यांवर वारसांची नोंद लावून ते आता ‘जिवंत’ करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात आतापर्यंत सुमारे सात हजारांहून अधिक वारसांच्या नोंदीच्या ठरावाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम एप्रिलपासून राज्यात लागू केली आहे. त्या मोहिमेतंर्गत सुमारे २२ लाख सातबारे अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यापैकी पाच लाखांहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहेत. मृत व्यक्तींच्या सातबाऱ्यांचा प्रत्येक जिल्ह्यात शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार मृतांच्या वारसांची नोंद करून सातबारे जिवंत करण्यात येत आहेत. याच मोहिमेत आता कालबाह्य झालेल्या नोंदी रद्द करण्यात येणार आहेत. त्यात ‘अपाक शेरा’, ‘एकुम’ (एकत्र कुटुंब मॅनेजर) नोंद, ‘तगाई कर्ज’, ‘भूसुधार कर’, ‘बिनशेती’, इतर पोकळीस्त यांसारख्या नोंदी कमी होणार आहेत.

त्याशिवाय नियंत्रित सत्ता प्रकार, भोगवटा वर्ग एक आणि भोगवटा वर्ग दोन अशा स्वतंत्र नोंदी करून त्यानुसार सातबारा उतारा तयार केला जाईल. त्यामुळे सातबारा अधिक सुस्पष्ट आणि सुटसुटीत होईल. राज्यात ४५ हजार गावे असून, त्यात २२ लाखांहून अधिक सातबारे हे जिवंत करण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत पाच लाखांहून अधिक सातबारे अद्ययावत करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २१ हजार ६२५ मृत व्यक्तींच्या नावाचा समावेश असलेले सातबारे शोधण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या सातबाऱ्यांची आणखी थोडीफार संख्या वाढू शकते. त्यापैकी ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे सात हजार ८२२ वारस नोंदीबाबतचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वारस नोंदीच्या ठरावाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी सात हजार २८० प्रस्तावांमध्ये पाच हजार ९८७ वारस फेरफार मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ३४२ फेरफार काही त्रुटींच्या कारणास्तव फेटाळण्यात आले आहेत. दाखल प्रस्तावांपैकी उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मृत सातबाऱ्यांमध्ये ‘मुळशी पॅटर्न’
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मुळशी तालुक्यातील सातबाऱ्यांमध्ये मृतांची नोंद अधिक असून, तीन हजारांहून अधिक नोंदी आहेत. त्यापाठोपाठ वेल्हे, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव या तालुक्यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक कमी मृत सातबारे हे पुणे शहरात असून, केवळ १३ सातबारे आढळले आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि लोणी काळभोर येथील उतारे आहेत.

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये मृत व्यक्तींचे २२ हजार सातबारे आढळले आहेत. त्याबाबत मृतांच्या वारसांची नोंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात आजमितीला ई-हक्क प्रणालीद्वारे सात हजार ८२२ अर्ज प्राप्त झाले असून, सुमारे सव्वासात हजार वारस नोंदींच्या ठरावाचा निर्णय घेण्यात आला आहे. – नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी (कूळ कायदा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *