मुंबईतील बीडीडी चाळ ही मुंबईची ओळख आहे. या बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आधी दिल्या जातील, अशी माहिती म्हाडातर्फे जाहीर करण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली.
वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास सुरु झाला आहे. अनेक चाळीतील संसार, कुटुंब आता गगनचुंबी इमारतीमध्ये राहायला जाणार आहेत. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांच्या नव्या घरांचा उंच टॉवर उभा राहिला आहे.
रहिवाशांचे काही प्रश्न व मागण्या होत्या त्यामुळे मंत्री आशीष शेलार यांनी आज बांधकाम सुरू असलेल्या टॉवरची पाहणी केली. रहिवाशांच्या अडचणी समजून घेतल्या. रहिवाशांनी नव्या इमारतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, अशी विनंती केली. त्यानुसार मंत्री नव्या इमारतीमधील रहिवाशांची संख्या विचारात घेऊन नवीन पाण्याच्या लाइन टाकून पाणी उपलब्ध करून द्या. तसेच पार्किंग टॉवरचे एक काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे तात्पुरती स्वरूपात शेजारी असणाऱ्या जुन्या दोन इमारती पाहून पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी केल्या, त्या सूचना म्हाडाने मान्य केल्या, तसेच पार्किंग लॉटरी पद्धतीने दिले जाईल, असेही बोरिकर यांनी सांगितले. दरम्यान, लवकरात लवकर चाव्या वाटप करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. तसेच येत्या श्रावणाच्या आत चाव्या ताब्यात देण्यात येतील, पाइप गॅस आणि सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील, असे बोरिकर यांनी या वेळी सांगितली.