शुक्रवारी पहाटेपासून येथील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पूलावर मास्टिकने रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. हे काम सकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरु होते. परंतु वाहनांचा भार वाढून वाहतुक मंदावल्याने त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. खारेगाव खाडी पूल ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर शिबलीनगर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ही वाहतुक कोंडी सुटण्यासाठी सकाळी १० वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी या मार्गावरून वाहतुक करु नका असे आवाहन केले आहे. वाहन चालकांनी मुंबई महापे रस्त्याचा वापर करावा असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. या वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.