MPSC च्या परीक्षा पुढे ढकला, पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; जितेंद्र आव्हाडांची मागणी

महाराष्ट्रात सध्या मान्सूनला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. मुंबई तसंच महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे गावांशी संपर्क तुटला आहे. अशावेळी महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाची (MPSC) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. ही परीक्षा 27 ते 29 मे 2025 या तीन दिवसांत होणार आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या X अकाऊंटवर म्हटलं आहे की, उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.

तसेच अंबादास दानवे यांनी देखील ट्विट करुन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. जीवावर उदार होऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेला येणे सरकार कसे अपेक्षित करू शकते?

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक मार्ग देखील ठप्प झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *