काळीज पिळवटून टाकणारी घटना! ज्या शेतात वडिलांचा अकाली मृत्यू तिथंच मुलानेही सोडले प्राण, तरुणाचा अकाली मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जांब येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. माजी सरपंच वनिता शिंदे यांचे ते पती होत. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ शिंदे यांच्या शेरी नावाच्या शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू असून मागील चार दिवस संततधार पाऊस पडत असल्याने काम ठप्प होते. रविवारी सकाळी शेतात फिरून येतो, असे सांगून सोमनाथ घराबाहेर पडले ते संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. दिवसभर पाऊस सुरू असल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने त्यांची आई उषा व पत्नी वनिता शिवारात राहत असलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांकडे फोनवरून चौकशी करू लागल्या. मात्र याबाबत माहिती मिळत नव्हती. शेतात विहिरीवर जाऊन बघून येतो, असे घरात सांगून शेतात गेलेले सोमनाथ आजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करत होते. यावेळी त्यांचा वायरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.

दरम्यान, येथील विकास सेवा सोसायटीचे सचिव व त्यांचे चुलतभाऊ रणजीत शिंदे यांना सोमनाथ विहिरीच्या बाजूला विजेचा धक्का लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. रणजीत यांनी गावातील लोकांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर सोमनाथचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलिस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली.

सोमनाथ यांच्या मृत्यूने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने खटाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू आहे.

सोमनाथ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे शिवारातच बैलाने मारल्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आई उषा यांनी सोमनाथ यांना हाताला धरून संसार पुन्हा जोमाने उभा केला होता. त्यांनी लहान वयातच घरची जबाबदारी पेलली होती. ते शेतात आईबरोबर कष्ट करत होते. अलीकडेच त्यांनी शेतीत विविध प्रयोग करून शेतीसह कुटुंबाची प्रगती केली होती. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. सोमनाथ यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रातही सहभाग घेऊ लागले होते. पत्नी वनिता यांना सरपंचपदी विराजमान करत स्वतःच्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *