‘राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. लवकरच रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र पाहायला मिळेल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
येथील वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता, उड्डाणपूल; तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या नऊ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड (महारेल) यांनी या प्रकल्पाचे काम केले आहे. या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.
‘ रेल्वे फाटक नसल्याने दर वर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी दहा हजारपेक्षा जास्त दळणवळणांतर्गत असलेल्या १२१ फाटकांसोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलांच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षांत ‘महारेल’तर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.’
‘रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामसाठी महारेलची स्थापना केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आरओबीला सोनबोईर यांचे नाव
भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाणपुलासोबतच येथील व्यावसायीकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयाच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयाचा निधी एनएचआयतर्फे देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधाअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ५०-५० टक्के खर्च वाटपाच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे, असे राजेशकुमार जयस्वाल म्हणाले.
