लघुशंका करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू प्रकरण, महावितरण अधिकारी आणि फूड कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये पावसात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काहीच दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात महावितरण अधिकारी, कर्मचारी आणि एका कंपनीच्या मालकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पश्चिमेला राहणारा विघ्नेश कचरे हा १७ वर्षीय युवक २० मे रोजी सायंकाळी पाऊस सुरू असताना केटी स्टील परिसरातील प्रियांश फूड कंपनीच्या संरक्षक भिंती जवळ लघुशंका करण्यासाठी गेला होता. मात्र या कंपनीच्या मालकाने भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या ठेवल्या होत्या, आणि त्यामुळे कंपनीच्या कंपाउंडमधील सिमेंटच्या खांबांना लावलेल्या लोखंडी तारांमध्ये विजेचा प्रवाह आला होता. या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी गेलेल्या विघ्नेश कचरे याला यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी प्रियांश फूड कंपनीचा मालक आणि भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणारे महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.

विघ्नेश ज्या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला त्या ठिकाणी वि‍जेचा प्रवाह खुला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या होत्या. याप्रकरणामुळे महावितरणचे अधिकारीही गोत्यात आले आहेत. अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले आहे. कधीही पाऊस सुरु होतो. शिवाय, मान्सून उंबरठ्यावर आहे. आणि अशा परिस्थित भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या असणं खूप धोक्याचं ठरतं. या संभाव्य धोक्याची अधिकाऱ्यांना जाण नव्हती का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. फूड कंपनी आणि महावितरणच्या या मोठ्या चुकीमुळे एका तरुणाचा नाहक बळी गेला. यामुळे नागरिकांमध्येही संताप पहायला मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला होता, आणि पुढे उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह पाठवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *