पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जाहीर केलेली तिकीट दरवाढ जून महिन्यापासून लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्रवाशांना जादा तिकीट देऊन प्रवास करावा लागणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते.
राज्य सरकारच्या २० डिसेंबर २००५ रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळाने २० डिसेंबर २०१४ पासून प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. यामध्ये १ ते ७८ किलोमीटरसाठी दोन किलोमीटरच्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होती. आता त्यात बदल करून ११ स्टेज करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेज कमी झाले आहेत. त्यानुसार, तिकीट दर सेट करणे व इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीच्या हद्दीत दैनंदिन १६०० बसद्वारे प्रवासी सेवा देण्यात येते. यातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न पीएमपीला मिळते. आता तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर पीएमपीचे उत्पन्न आपोआप वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीलच्या दैनंदिन उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ होणार आहे. त्याचा फायदा पीएमपीला होणार आहे; पण प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.