ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब? ‘उद्धव ठाकरे दिलसे आणि मनसे…’, राऊतांचं सूचक विधान

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संख्याच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. आता याच विषयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. मनसे अध्यक्षांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देताना राऊतांनी, ‘दिलसे आणि मनसे’ ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं सूचक विधान केलं आहे.

उद्धव ठाकरेंसमोर सांगितलं

“राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही. मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात पण तसे नाही आहे एकमेकांच्या बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्र पल्लवी करतील,” असं संजय राऊतांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी, “आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरेंसमोर मनसेसोबत नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका असल्याचं म्हणणं ठेवलं आहे” असं विधान केलं.

मोदी-शाहांवर निशाणा

“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरती जनतेचा प्रेशर आहे. हे प्रेशर भावनिक आहे तसं राजकीयसुद्धा आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार कायम ठेवायचा असेल, ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसात प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.

पडद्याच्या नाड्या त्यांच्या हातात नाहीत

“उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आम्ही चर्चा केली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्राने मराठी माणसासाठी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचीही याबद्दल एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे,” असं राऊतांनी म्हटलं आहे. “पडद्याच्या नाड्या त्यांच्या हातात नाहीत. आमच्या हातात आहेत. पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे भाऊ ठरवतील,” असं सूचक विधानही राऊतांनी केलंय.

मोदी, शहा आणि फडणवीस ही नावं फुसली जातील

राज ठाकरेंनी मुलाखतीत ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपणार नाही असं विधान केलं. यावरुन बोलताना राऊतांनी, “ते बरोबर बोलत आहेत. आम्हीही तेच सांगतो हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे मालक दिल्लीत बसले आणि मुंबईतून गेलेले. ते मुंबईत येणार नाही त्यासाठी आधी ठाकरे आणि पवार यांना संपवा, त्यासाठी पक्ष तोडले. लोकांना तुरुंगात टाकलं चिन्ह काढून घेतलं. ही त्यांची भूमिका आहे. ईस्ट इंडिया कंपनी सुरत ही त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकरे आणि पवारांच्या मागे अजून आहेत,” असं सांगितलं.

“या देशातून मोदी, शहा आणि फडणवीस ही नावं फुसली जातील. मी तुम्हाला खात्रीने सांगतो.जब तक सुरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे ब्रँड राहतील. एक निवडणूक जाऊ द्या मोदी आणि शहा हे तुम्हाला संपलेले दिसतील,” असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *