फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर केलेल्या एअरस्ट्राईकवर भाष्य केले. भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘Operation Sindoor’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
योगेश कदम काय म्हणाले?
जम्मू काश्मीर येथील पहलागममधून पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कायम हल्ला करत राहणं, जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देत राहणं, हे पाकिस्तान कायमच करत आला आहे, त्यांनी यातून कधी शिकवण घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन, कारण भारतीय लष्कराला नौदलाला सूट दिली, त्यांनी आपल्या पद्धतीने कारवाई करावी, असं सांगितलं, आतापर्यंत अशी सूट कुठल्या पंतप्रधानांनी दिली नव्हती, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
