डोळ्यांमुळे आपण सुंदर जग पाहू शकतो. पण ज्यांना दृष्टी नाही त्यांना हे विश्व आपल्या डोळ्यांनी अनुभवता येत नाही. रस्त्याने चालताना त्यांना काठीचा किंवा सोबतच्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो. अशा अंध व्यक्तींसाठी आठवीतल्या विद्यार्थ्यांनी एक संशोधन केलंय. ज्याचा जगभरातील अंध व्यक्तींना फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना कशी सुचली ही संकल्पना? याचा अंध व्यक्तींना कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.
अंध व्यक्तीना ठेच लागू नये यासाठी इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी स्मार्ट शूज बनवलेत. अंध व्यक्तींना चालताना कुठल्याही अडथळ्याची पूर्वकल्पना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी ही स्मार्ट शूज तयार करण्याची कल्पना सुचली.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या स्मार्ट शूजमुळे अंध व्यक्तींच्या मार्गात कुठलाही अडथळा आला तर शूजमधून बझर वाजू लागतो. यामुळे अंध व्यक्तींना पूर्वकल्पना मिळते. अर्डीनो युनो (Ardiuno uno) अल्ट्रासॉनिक सेन्सर (ultrasonic sensor) आणि बझर (buzzer) यांचा उपयोग करून हे स्मार्ट शूज बनवन्यात आले आहेत. बुटाच्या समोरच्या बाजूस अल्ट्रासॉनिक सेन्सर लावण्यात आलाय.
हे सेन्सर अर्डीनो युनो आणि बझरशी जोडण्यात आले आहेत. यात अर्डीनो युनो एखाद्या मदर बोर्डप्रमाणे काम करते. बुटासमोर कुठलाही अडथळा आला तर अल्ट्रासॉनिक सेन्सर लगेच अर्डीनोयुनोला माहिती कळवते आणि अर्डीनो युनो बझरला कमांड देते, अशी माहिती आठवीतल्या संशोधक विद्यार्थी अथर्व जाधव याने दिली. बुटासमोर अडथळा आल्यास क्षणार्धात बझर वाजने सुरु होते. सध्या अल्ट्रासॉनिक सेन्सर ची मर्यादा 10 सेंटी मिटर पर्यंत ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा सहज वाढवली जाऊ शकते, असेही त्याने पुढे सांगितले.
सध्याच्या शूजमध्ये अर्डीनो युनो, अल्ट्रा सॉनिक सेन्सर आणि बझर ची साईज थोडी मोठी आहे. पण या तीनही वस्तू मायक्रो साईजमध्येही उपलब्ध आहेत. या वस्तू मायाक्रो साईजमध्ये करून त्या स्मार्ट शूजच्या आत कशा फिट होऊ शकतील यासाठी आम्ही विद्यार्थी प्रयत्न करत आहोत. हे स्मार्ट शूज लवकरच अंध व्यक्तींना वापरात आणता येऊ शकतील, असे विद्यार्थी व्यंकटेश रुद्रावार याने सांगितले.
नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या स्मार्ट शूजने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यांचे हे संशोधन अंध व्यक्तींच्या प्रत्यक्ष कामात येण्यासाठी शासनानेही या विद्यार्थ्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.
