मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा आकडा 38 ते 39 अंशांच्या पलिकडे पोहोचत असताना आणि शहरात उष्णतेच्या लाटेसदृश्य वातारण असताना अचानकच शहरातील काही भागांमध्ये भारनियमनाची परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मालाड, भाईंदर, मीरा रोड, बोरिवली, कल्याण, अंबरनाथ इथं भर उन्हाच्या तासांमध्ये साधारण 55 मिनिटं ते तासभर वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या ग्राहकांकडून सातत्याने तब्बल 26000 मेगावॉटहून अधिक तर, मुंबईच्या ग्राहकांकडून 3600 मेगावॉटहून अधिक वीजमागणी आणि त्याचा पुरवठा होत असताना मंगळवारी महामुंबईसह वीज वितरणात खंड पडल्याचं पाहायला मिळालं. फक्त मुंबईच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही हीच स्थिती होती. एकाएकी अनपेक्षितरित्या, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या या भारनियमानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्यक्षात राज्यात एकाएकी झालेल्या या भारनियमनास यानंतर गुजरात राज्य कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं.
