बीडमध्ये पाच वर्षांत २७६ खून; ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

राज्यातील गुन्हेगारी कारवायांचे केंद्र म्हणून बदनाम होत असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल २७६ जणांचे खून करण्यात आले. तर ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या १० महिन्यांत या जिल्ह्यात ३६ खुनाच्या घटना उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी विधिमंडळात देण्यात आली.

आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आदींनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. बीड जिल्ह्यात देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे हा फरार आहे.

त्याचप्रमाणे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही, ज्या २६० जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते, त्यातील १९९ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. देशमुख यांच्याप्रमाणेच बालाजी घरबुडे आणि महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाचा तपासही सुरू असल्याचे फडणवीस यांनी लेखी उत्तरात नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *