अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, थंडी अशा सततच्या बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनात मोठी घट झाल्याने ऐन लग्नसराईमध्ये मोगऱ्याचा दर तिपटीने वाढून किलोला ३ हजारांवर पोहचला आहे. यामुळे नववधूंची वेणी मोगऱ्याऐवजी मोगऱ्यासारख्या दिसणाऱ्या काकडा फुलांनीच सजवावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह अनेक शहरांतील फुलबाजारात सध्या या मोगऱ्याच्या वाढलेल्या दराची चर्चा आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज दुय्यम बाजार आवारात दररोज पहाटेपासून फुलांचे सौदे होतात. पश्चिम महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा बाजार असल्याने या ठिकाणाहून सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर, हैदराबाद या ठिकाणी फुले पाठविण्यात येतात.
