छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी सहलीसाठी गोव्याला गेले होते. मात्र गोव्यावरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव येथे बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल परशुराम भिसे (वय ४०, रा. चौधरी भूमी, सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
काळ कोणाचा कसा आणि कधी घात करेल याचा काही नेम नाही. सहलीला गेलेल्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांवर अपघाताची वेळ येईल याचा विचारही त्यांच्यापैकी कोणी केला नसेल. मौज मजा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परतीच्या वेळेस एका वाईट वेळेला सामोरे जावे लागेल असं कोणालाही वाटलं नसेल. परंतु बस उलटून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीतील सुमारे १४३ कर्मचारी ३० जानेवारी रोजी चार खासगी बसमधून सहलीसाठी गोव्याला गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ते गोव्यावरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने परत निघाले. यावेळी त्यांनी कणकवलीमध्ये जेवण करण्यासाठी थांबा घेतला. व तेथून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने निघाले. याचवेळी एक बस क्रमांक डीडी ०१ टी ९३३३ ही रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील कांडगाव येथील शेरीच्या माळ जवळ असलेल्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक उलटली.
दरम्यान या बस मध्ये असलेल्या ३५ प्रवाशांपैकी एक जण जागीच ठार झाला. तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना माहिती कळवली. दरम्यान पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. आणि अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. यापैकी चार जण गंभीर जखमी असून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.