राज्यात सर्वदूर वादळी पाऊस

अरबी समुद्रात पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईसह कोल्हापूर, पुणे आणि महाबळेश्वरसह शुक्रवारी दुपारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वादळी पाऊस झाला. सोलापूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नगरमध्येही पावसाशी संबंधित अपघातात दोन जण दगावले. वाशीम जिल्ह्य़ात शुक्रवारी झालेल्या पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये वीज पडून एकाचा, लातूरमध्ये तिघांचा तर परभणीत तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या चटक्यांनी ग्रासलेल्या मुंबईकरांना धारांचा उतारा लाभला.

सुटीचा दिवस असल्यामुळे परतीच्या पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक मुंबईकरांनी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेतली. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. पाऊस आणखी काही दिवस मुंबई आणि आसपासच्या शहरांत मुक्कामी राहिल्यास मुंबईत जारी करण्यात येणारी पाणी कपात मागे घेता येईल, असे जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ठाण्यामध्ये पावसामुळे झाडाच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये काहीकाळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. कल्याण, डोंबिवली, बदलापूर  यांसोबत काही ठिकाणी जोरदार वीज पडल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *